।। श्री राम समर्थ श्री राम ।।
ओव्या:
भिकाऱ्यापासीं मागतां भिक्षा। दीक्षाहीनापासीं दीक्षा।
उजेड पाहतां कृष्णपक्ष। पाविजे कैंचा ।।२८।।
अबद्धापासीं गेला अबद्ध। तो कैसेनि होईल सुबद्ध।
बद्धास भेटतां बद्ध। सिद्ध नव्हे।। २९।।
देहापासीं गेला देही। तो कैसेनि होईल विदेही।
म्हणौनि ज्ञात्यावांचून नाहीं। ज्ञानमार्ग।। ३०।।
याकारणें ज्ञाता पाहावा। त्याचा अनुग्रह द्यावा।
सारासार विचारें जीवा। मोक्ष प्राप्त ।।३१।।
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे षष्टे दशके देवशोधनाम समास पहिला ।।१।।
मराठी अर्थ:
भिकाऱ्याकडे जाऊन भिक्षा मागणे, असंप्रदायिक मनुष्याकडून दीक्षा घेणे आणि कृष्णपक्षात प्रकाशाची अपेक्षा करणे; या गोष्टी निरर्थर आहेत. (२८)
स्वैराचारी (मनाला वाटेल तसा वागणारा) माणसाला जर दुसरा स्वैराचारी भेटेल तर तर तो कधी शिस्तीने वागेल काय? तसाच बद्धाजवळ जर सिद्ध होण्याच्या अपेक्षेने दुसरा बद्ध जाईल तर तो सिद्ध होऊ शकणार नाही. (२९)
देहबुद्धी असलेल्यापाशी दुसरा देहबुद्धीचा माणूस गेला तर तो विदेहमुक्त कसा होऊ शकेल? म्हणूनच ज्ञानी मनुष्याशिवाय ज्ञानमार्ग कुठेही मिळणार नाही. (३०)
याचसाठी ज्ञानी मनुष्याचा शोध घ्यावा आणि त्याच्याजवळून अनुग्रह (कृपेसाठी दिली जाणारी दीक्षा.) घ्यावा. नंतर सारासार विचार करत राहून जिवाला मोक्ष मिळतो. (३१) ।। श्री राम ।।
सार्थ दासबोधाच्या सहाव्या दशकामधील देवाचा शोध नावाचा पहिला समास समाप्त झाला.
दशक ६ समास १ समाप्त.