Monday, 11 March 2024

दशक २ : समास १ (ओवी ३७)

।। श्री राम समर्थ श्री राम ।।

क्रोधे अपमाने कुबुद्धि । आपणास आपण वधी ।

जयास नाही दृढ बुद्धि । तो येक मूर्ख ।। 

----------------------------

अर्थ : रागाच्या भरामध्ये किंवा अपमानामुळे दुर्बुद्धि होऊन जो आत्महत्या करतो, 

ज्याला स्थिर राहणारी बुद्धि नाही तो मूर्ख समजावा. 

Share:

Wednesday, 24 January 2024

दशक ६ : समास १ (ओव्या २८, १९, ३० आणि ३१)

।। श्री राम समर्थ श्री राम ।।


ओव्या: 

भिकाऱ्यापासीं मागतां भिक्षा। दीक्षाहीनापासीं दीक्षा। 

उजेड पाहतां कृष्णपक्ष। पाविजे कैंचा ।।२८।। 

अबद्धापासीं गेला अबद्ध। तो कैसेनि होईल सुबद्ध। 

बद्धास भेटतां बद्ध। सिद्ध नव्हे।। २९।। 

देहापासीं गेला देही। तो कैसेनि होईल विदेही। 

म्हणौनि ज्ञात्यावांचून नाहीं। ज्ञानमार्ग।। ३०।। 

याकारणें ज्ञाता पाहावा। त्याचा अनुग्रह द्यावा। 

सारासार विचारें जीवा। मोक्ष प्राप्त ।।३१।। 

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे षष्टे दशके देवशोधनाम समास पहिला ।।१।।


मराठी अर्थ:

भिकाऱ्याकडे जाऊन भिक्षा मागणे, असंप्रदायिक मनुष्याकडून दीक्षा घेणे आणि कृष्णपक्षात प्रकाशाची अपेक्षा करणे; या गोष्टी निरर्थर आहेत. (२८)

स्वैराचारी (मनाला वाटेल तसा वागणारा) माणसाला जर दुसरा स्वैराचारी भेटेल तर तर तो कधी शिस्तीने वागेल काय? तसाच बद्धाजवळ जर सिद्ध होण्याच्या अपेक्षेने दुसरा बद्ध जाईल तर तो सिद्ध होऊ शकणार नाही. (२९)

देहबुद्धी असलेल्यापाशी दुसरा देहबुद्धीचा माणूस गेला तर तो विदेहमुक्त कसा होऊ शकेल? म्हणूनच ज्ञानी मनुष्याशिवाय ज्ञानमार्ग कुठेही मिळणार नाही. (३०)

याचसाठी ज्ञानी मनुष्याचा शोध घ्यावा आणि त्याच्याजवळून अनुग्रह (कृपेसाठी दिली जाणारी दीक्षा.) घ्यावा. नंतर सारासार विचार करत राहून जिवाला मोक्ष मिळतो. (३१) ।। श्री राम ।। 

सार्थ दासबोधाच्या सहाव्या दशकामधील देवाचा शोध नावाचा पहिला समास समाप्त झाला. 


दशक ६ समास १ समाप्त. 

Share:

Tuesday, 23 January 2024

दशक ६ : समास १ (ओव्या २६ आणि २७)

                                                                    ।।श्री राम समर्थ श्री राम ।।


ओव्या:
रोग्यापासीं रोगी गेला। तेथें कैंचें आरोग्य त्याला। 
निर्बलपासीं निर्बळाला। पाठी कैंची ।।२६।। 

पिशाच्यापासीं पिशाच्य गेलें। तेथें कोण सार्थक जालें। 
उन्मत्तास उन्मत्त भेटलें। त्यास उमजवी कवणु ।।२७।। 

मराठी अर्थ:
आजारी मनुष्य आरोग्यासाठी दुसऱ्या रोग्याकडे जाईल तर तो कधी निरोगी होईल काय? किंवा एक दुर्बल जर का दुसऱ्या दुर्बळापाशी गेला तर त्याचे संरक्षण कसे बरे होईल. (२६)

पिशाचापाशी दुसरे पिशाच गेले तर कसला उद्धार होणार? एका उन्मत्ताला (मस्तवाल) दुसरा उन्मत्त भेटला तर समजूत कोण कुणाची काढणार? (२७)


Share:

Monday, 22 January 2024

दशक ६ : समास १ (ओव्या २४ आणि २५)

     ।।श्री राम समर्थ श्री राम ।।

ओव्या: 
ऐसें जयापासीं ज्ञान। तोचि जाणावा सज्जन।
तयापासीं समाधान। पुसलें पाहिजें।। २४।। 

अज्ञानास भेटतां अज्ञान। तेथें कैंचें सांपडेल ज्ञान। 
करंट्यास करंट्याचे दर्शन। होतां भाग्य कैंचें ।।२५।।

मराठी अर्थ:
असे ज्ञान ज्याच्याजवळ असेल तोच खरा सज्जन असतो आणि त्याच्यापाशी जाऊनच समाधानाचा शोध घेतला पाहिजे. (२४)

अज्ञानी माणसाकडे जर दुसरा अज्ञानी मनुष्य ज्ञानप्राप्तीकरता जाईल तर ज्ञान कसे मिळेल बरे? 
करंटा (दुर्भागी, कमनशिबी) मनुष्य जर दुसऱ्या करंट्यापाशी गेला तर त्याचे भाग्य कधी उजळेल काय? (२५)


Share:

Sunday, 21 January 2024

दशक ६ : समास १ (ओव्या २१,२२ आणि २३)

    ।।श्री राम समर्थ श्री राम ।।

ओव्या: 
देव वोळखावा येक। तेंचि ज्ञान तें सार्थक। 
येर अवघेंचि निरार्थक। पोट विद्या ।।२१।। 

जन्मवरी पोट भरिलें। देहाचें संरक्षण केलें। 
पुढें अवघेंचि वेर्थ गेलें। अंतकाळीं ।।२२।। 

येवं पोट भराव्याची विद्या। तयेसी म्हणों नये सद्विद्या। 
सर्वव्यापक वस्तु सद्या। पाविजे तें ज्ञान ।।२३।। 

मराठी अर्थ:
एकमेव देव ओळखणे हेच ज्ञान सार्थक करणारे असते, इतर सर्व केवळ पोट भरण्याच्या विद्या असून त्या निरर्थक आहेत. (२१)

संपूर्ण जन्म पोटासाठी खटाटोप करण्यात गेला आणि शरीर पोसण्यातच खर्ची घातला तर अंतकाळी पुढे ते सर्वच व्यर्थ जाणारे आहे. (२२)

तात्पर्य असे की, प्रपंच चालवून पोट भरायची जी विद्या तीच सद्विद्या अशी समजूत करून घेऊ नये तर कणाकणाला व्यापून राहाणारे जे तत्व आहे ते "याचि देही याचि डोळा" प्राप्त करून घेणे हेच खरे ज्ञान होय. (२३)


Share:

Saturday, 20 January 2024

दशक ६ : समास १ (ओव्या १९ आणि २०)

   ।।श्री राम समर्थ श्री राम ।।

ओव्या:

जाणिजे परमात्मा निर्गुण। त्यासीच म्हणावे ज्ञान। 

त्यावेगळें तें अज्ञान। सर्व कांहीं ।। १९।। 

पोट भाराव्याकारणें। नाना विद्या अभ्यास करणें। 

त्यासी ज्ञान म्हणती परी तेणें। सार्थक नव्हे ।।२०।। 

मराठी अर्थ:

निर्गुण परमात्म्याला जाणून घेणे हेच खरे ज्ञान आहे. त्याव्यक्तरिक्त जे-जे काही आपण जाणतो असे वाटत असते, ते खरे अज्ञानच असते. (१९)

प्रपंच चालवता येऊन पोटापाण्याची सोय व्हावी यासाठी अनेकानेक विद्या व कला यांचा अभ्यास केला जातो व त्याला ज्ञान म्हणतात. परंतु त्या ज्ञानामुळे जीवनाचे सार्थक होत नसते. (२२)



Share:

Friday, 19 January 2024

दशक ६ : समास १ (ओव्या १७ आणि १८)

  ।।श्री राम समर्थ श्री राम ।।


ओव्या:
चळेना ढळेना देव। ऐसा ज्याचा अंतर्भाव। 
तोचि जाणिजे महानुभाव। संत साधू ।।१७।। 

जो जनामधें वागे। परि जनावेगळी गोष्टी सांगे। 
त्याचे अंतरीं ज्ञान जागे। तोचि साधु ।।१८।। 

मराठी अर्थ:
संत, साधू किंवा महात्मा हा अचल, अजर, अमर अशा देवाला अंतर्यामी जाणत असतो. (१७)

असा महात्मा हा कुठे अवघड जागी राहत नसून तो लोकांमध्येच राहून लाकांसारखाच वागतो. पण त्याच्या अंतरात ज्ञान प्रकट झालेले असल्यामुळे तो लोकांप्रमाणे सांसारिक चर्चा न करता काही वेगळ्याच मार्गाचा उपदेश करतो. (१८)


Share: